MLA Deshmukh : बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांबाबत शनिवारी (दि. २९) अकोला येथील शासकीय विश्रामगृहात महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

‘वीजपुरवठ्यात दिरंगाई खपवून घेणार नाही’; शेतकऱ्यांच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर
बाळापूर : बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांबाबत शनिवारी (दि. २९) अकोला येथील शासकीय विश्रामगृहात महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला बाळापूर व पातूर तालुक्यांतील उपअभियंते, संबंधित अधिकारी, विविध वीज उपकेंद्रांचे कनिष्ठ अभियंते तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाळापूर-पातूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी शेतीपंपांसाठी होणारा अनियमित वीजपुरवठा, वारंवार होणारे वीजखंडित होणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलणे, प्रलंबित वीज जोडण्या तसेच इतर वीजविषयक समस्यांचा पाढा आमदार नितीन देशमुख यांच्यासमोर मांडला.
‘वीजपुरवठ्यात दिरंगाई खपवून घेणार नाही’
शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आमदार नितीन देशमुख यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतीसाठी आवश्यक वीज वेळेत आणि सुरळीत मिळणे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे, प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण करणे तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या वीज समस्यांबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, बैठकीनंतर संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी तातडीने मार्गी लावून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

