Microorganisms : शहरातील शतरंजीपुरा परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. अरमानी मेडिकलजवळील सार्वजनिक नळाच्या पाण्याच्या नमुन्यात सूक्ष्मजीव आढळल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, अकोला यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून धक्कादायक उघड
ज़ाकिर अहमद
बाळापूर : शहरातील शतरंजीपुरा परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. अरमानी मेडिकलजवळील सार्वजनिक नळाच्या पाण्याच्या नमुन्यात सूक्ष्मजीव आढळल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, अकोला यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत १२ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या या पाण्याच्या नमुन्याची सूक्ष्मजैविक तपासणी करण्यात आली. तपासणीअंती प्रति १०० मिली पाण्यात १६ कोलिफॉर्म जीवाणू आणि ४ थर्मोटॉलरंट जीवाणू आढळले, तर ई. कोलाई जीवाणू आढळून आला नाही. तरीही पाण्यात सूक्ष्मजीवांची उपस्थिती लक्षात घेता हे पाणी मानवी वापरासाठी असुरक्षित ठरविण्यात आले आहे. या नमुन्याची तपासणी १२ मार्चपासून सुरू होऊन १७ मार्च २०२६ रोजी अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
या धक्कादायक अहवालानंतर शतरंजीपुरा परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा, अतिसार यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांसह नगरसेवक मो. अकरम यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नळ योजनेतील गळती शोधून दुरुस्ती करणे, पाण्यात योग्य प्रमाणात क्लोरीन मिसळणे तसेच नियमित पाण्याची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देणार नाही. संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात,”— मो. अकरम, नगरसेवक!

