Message of values: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे ‘बालदिंडी व शिक्षणाची वारी’ हा अभिनव उपक्रम शुक्रवारी (दि. २४ जुलै) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

‘शिक्षणाची वारी’ने भारावला देऊळगाव राजा; विद्यार्थ्यांनी साकारली वारकरी परंपरा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे ‘बालदिंडी व शिक्षणाची वारी’ हा अभिनव उपक्रम शुक्रवारी (दि. २४ जुलै) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी, टाळकरी, फुगडीकरी, पताकाधारी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी होत आषाढी वारीचे जिवंत चित्र साकारले. फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा, भारतीय संविधान आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ विराजमान करण्यात आले होते.
टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि नामस्मरण करत विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून दिंडी काढली. “विठ्ठल… विठ्ठल…” च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे दिंडीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले.
‘शिक्षणाची वारी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “पर्यावरणाचे रक्षण करा”, “स्वच्छता राखा” आणि “शिक्षण हाच खरा धर्म” अशा विविध सामाजिक व शैक्षणिक संदेशांचा प्रभावी प्रचार केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेचे महत्त्व, संविधानाबद्दल आदर आणि वारकरी परंपरेतील समता, भक्ती व संस्कार यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे ‘बालदिंडी व शिक्षणाची वारी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
या अभिनव उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनीही कौतुक करत, अशा सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जपणूक होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

