Marathi Language Pride Day : ७ फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सु. ना. उ. खे. महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

अकोला : २७ फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सु. ना. उ. खे. महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थापक सचिव मा. बी. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये कथाकथन, ‘लेखक आपल्या भेटीला’, विद्यार्थ्यांचे काव्यवाचन, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. यंदा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्बोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास पांडे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख, कवी व समीक्षक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते. याशिवाय आयक्यूएसी समन्वयक डॉ. अमोल मेश्राम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मराठी विभागाचे प्राध्यापक तथा सांस्कृतिक समन्वयक प्रा. एन. एफ. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रमुख वक्ते डॉ. भास्कर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी ही आपली मातृभाषा असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बोलीभाषा मागे पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेवर प्रेम करीत दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवावा, तसेच मराठी साहित्याचे वाचन-लेखन करून भाषेला समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषा विविध प्रादेशिक बोलींच्या संगमातून समृद्ध झाली आहे. त्या सर्व बोलींचा सन्मान राखत मराठीचा वापर वाढविला, तर भाषेची समृद्धी अधिक वाढेल, असेही ते म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही त्यासंदर्भातील ठोस कृती कार्यक्रम अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अंबादास पांडे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती सर्वप्रथम मातृभाषेतच विचार करत असतो. ज्याची मातृभाषेवर चांगली पकड असते, त्याला इतर भाषा आत्मसात करणे अधिक सोपे जाते. इतर भाषांचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे असले तरी आपली मातृभाषा हातातून निसटू देता कामा नये. घरात मुलांवर मातृभाषेचे संस्कार झाले, तर त्यांची विचारशक्ती, वाचन क्षमता आणि मूल्यदृष्टी अधिक सक्षम होते, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. अमोल मेश्राम यांनीही मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने भाषेच्या जतनाबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एन. एफ. चव्हाण यांनी केले. त्यांनी विविध बोलीभाषांची उदाहरणे देत मराठी भाषेबाबत गांभीर्याने विचार केल्यास अनेक भाषिक प्रश्न सोडविता येतील, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाचे प्रा. पद्माकर सदांशिव यांनी केले, तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता तिहिले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नितीन देऊळकर, प्रा. संदेश गवारगुरु, प्रा. अनंत राठोड, डॉ. राधा मुरूमकर, डॉ. राहुल वाधवाणी, डॉ. एकनाथ खेडकर, प्रा. विनोद इंगोले, प्रा. संदीप कुऱ्हाडे, प्रा. दीपक वाघमारे, प्रा. योगेश चव्हाण, डॉ. किरण शर्मा, डॉ. भारती चोखानी, प्रा. रश्मी पंजवाणी, प्रा. ज्योती वानखडे, प्रा. हर्षदा जाधव आदींनी सहकार्य केले. यावेळी मराठी भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

