Jio network down : बीबी परिसरात जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील जिओ सिमधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चार दिवस सेवा खंडित झाल्याने नागरिक संतप्त, नुकसानभरपाईची मागणी
बीबी : बीबी परिसरात जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील जिओ सिमधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
१० फेब्रुवारी २०२६ पासून जिओची मोबाईल सेवा खंडित झाली असून १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याची तक्रार आहे. परिणामी नागरिकांचा परस्परांशी संपर्क तुटला असून मोबाईलवर केवळ ‘हॅलो-हॅलो’ इतकाच आवाज ऐकू येत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने फोनपे, गुगल पे यांसारखे डिजिटल व्यवहार करता आले नाहीत. काही नागरिकांचे वैद्यकीय, लग्नसमारंभ तसेच इतर तातडीचे आर्थिक व्यवहारही अडचणीत आले. अनेकांची महत्त्वाची कामे रखडल्याने मानसिक ताण वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्राहकांकडून प्रीपेड रिचार्जचा पैसा आधीच घेतला जातो; मात्र सलग चार दिवस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सेवा न दिल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल कंपनीने ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

