vacate your position! : राज्य महामार्ग क्रमांक २८४ वर एकाच रस्त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेगवेगळा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री रस्ता बांधकाम दाखवण्यात आले आहे. हा प्रकार साधा घोटाळा नसून महा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात आलेगाव येथे रास्ता रोको आंदोलन
राहुल सोनोने
दिग्रस बू. : राज्य महामार्ग क्रमांक २८४ वर एकाच रस्त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेगवेगळा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री रस्ता बांधकाम दाखवण्यात आले आहे. हा प्रकार साधा घोटाळा नसून महा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी केला आहे.
शासनाचा निधी बोगस कामे दाखवून लाटला जात असून दोषी अधिकारी व भ्रष्ट राज्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच दर्जेदार रस्ता बांधून द्यावा या प्रमुख मागणीसाठी २४ डिसेंबर (बुधवार) रोजी आलेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आदिवासी बहुल परिसरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून रस्ते, पूल यांची बोगस बांधकामे करण्यात आली आहेत. कोणी आवाज उठवू नये म्हणून पैसे देऊन आंदोलन दडपले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.“हा रस्ता नसून आमचा जीव अडवला गेला आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वारंवार निवेदने देऊनही केवळ आश्वासनांची पत्रे मिळत असून प्रत्यक्षात कामे अर्धवट व निकृष्ट दर्जाची सुरू असल्याचे सांगण्यात आले. खड्डेयुक्त रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून नागरिकांना आरोग्यविषयक समस्या, शाळकरी मुलांचा धोकादायक प्रवास, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
निलेश कापकर यांनी रस्ता कामांतील घोटाळ्यांचे मुद्देसूद विवेचन केले. प्रशांत महाराज यांनी भजनातून “हा रस्त्यावर खड्डे नसून खड्ड्यांचा रस्ता आहे,” असे मार्मिक भाष्य केले. रक्षण भाऊ देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नितीन ढोणे यांनी लोकजागृतीशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही, त्यामुळे आंदोलन अपरिहार्य असल्याचे सांगितले.
नागरिकांच्या जोरदार घोषणाबाजीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजेश राठोड यांनी कामाची पाहणी करून ठेकेदाराला समज देण्याचे आश्वासन फोनद्वारे दिले. तसेच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी फोनवरून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर सर्वानुमते आंदोलन स्थगित करण्यात आले. आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष प्रदीप परनाटे, शेतकरी राजा ग्रुप अध्यक्ष रविभाऊ सोनोने, चरणगाव येथील व्यावसायिक अतुल वसतकार, नितीन ढोणे, पुरुषोत्तम आवटे, अमोल गिऱ्हे, रक्षण देशमुख, बाबूसिंग चव्हाण, भगवान राठोड, संदीप राठोड, मुजीब भाई, नदीम भाई, मस्तान भाई तसेच मोठ्या संख्येने आलेगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

