Srinivasji Bedekar : भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती आणि कौटुंबिक संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. कुटुंब व्यवस्था टिकली आणि नाती जपली तर देश व संस्कृतीही टिकेल. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे कुटुंब घडविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ प्रांत घोष प्रमुख श्रीनिवासजी बेडेकर यांनी केले.

देऊळगाव मही येथे हिंदू संमेलन उत्साहात; तरुण-महिला-पुरुषांची मोठी उपस्थिती
देऊळगाव मही : भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती आणि कौटुंबिक संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. कुटुंब व्यवस्था टिकली आणि नाती जपली तर देश व संस्कृतीही टिकेल. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे कुटुंब घडविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ प्रांत घोष प्रमुख श्रीनिवासजी बेडेकर यांनी केले.
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देऊळगाव मही येथील पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर मंगल कार्यालयात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. राजेंद्र महाराज तळेकर तसेच सौ. सविताताई समाधान शिंगणे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीनिवासजी बेडेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपले भोजन, भाषा, भूषा, भजन, भ्रमण आणि भवन हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे असावे. संघटित हिंदू समाज घडविण्यासाठी संघाचे कार्य सुरू असून व्यक्तीनिर्माणाच्या माध्यमातून ते साध्य होत आहे. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पंचपरिवर्तनाच्या तत्वांचे आचरण केल्यास २०४७ पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारत नक्कीच विश्वगुरू बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी राजेंद्र महाराज तळेकर यांनी हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचे रक्षण आणि हिंदूंची कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. तर सौ. सविताताई शिंगणे यांनी नारी सुरक्षा या विषयावर बोलताना महिलांची वेशभूषा, आचरण तसेच मोबाईलचा योग्य वापर करून स्वतःचे संरक्षण कसे करता येईल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत माता यांच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संयोजक ह.भ.प. सुनील महाराज शिंगणे यांनी केले. या हिंदू संमेलनात तरुण, महिला, पुरुष तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशीतील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १४ मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या सामूहिक आरतीने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

