Gram Panchayat Elections: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले असून सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम लागू राहणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गावच्या राजकारणाला वेग! ग्रामपंचायत सदस्य आरक्षणावर २५ जूनपर्यंत हरकतींची संधी
बुलढाणा : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले असून सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम लागू राहणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याचे आदेश २५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत नागरिक, इच्छुक उमेदवार तसेच स्थानिक राजकीय गटांना २५ जूनपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती व निवडणूक प्रक्रिया ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच संबंधित नियम, परिपत्रके आणि शासन आदेशांनुसार निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत वेळापत्रकात विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.
आरक्षण प्रक्रियेत तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा सक्रिय सहभाग राहणार असून सर्व तहसीलदारांना संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेस आवश्यक सहकार्य सुनिश्चित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आरक्षण सोडतीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
* विशेष ग्रामसभेची सूचना – ०८ जून २०२६
* विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत – १२ जून २०२६
* प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६
* प्रारूप आरक्षण प्रसिद्ध – १९ जून २०२६
* हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – १९ ते २५ जून २०२६
* हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ०३ जुलै २०२६
* अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ०८ जुलै २०२६
* अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर – १० जुलै २०२६
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आरक्षण सोडत महत्त्वाची मानली जात असून त्यावर गावपातळीवरील राजकीय समीकरणे, इच्छुक उमेदवारांची रणनीती आणि स्थानिक आघाड्यांचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे संबंधित नागरिकांनी व इच्छुकांनी या प्रक्रियेची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

