Gap opens up in bridge: डोणगाव ते शेलगाव देशमुख मार्गावरील कऱ्हाळवाडी फाट्याजवळ असलेल्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाची अवस्था गंभीर झाल्यामुळे या मार्गावरील एसटी बस सेवा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ऐन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुलाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे हाल; कऱ्हाळवाडी फाट्याजवळ अपघाताचा धोका वाढला
डोणगाव : डोणगाव ते शेलगाव देशमुख मार्गावरील कऱ्हाळवाडी फाट्याजवळ असलेल्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाची अवस्था गंभीर झाल्यामुळे या मार्गावरील एसटी बस सेवा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ऐन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडील पावसामुळे कऱ्हाळवाडी फाट्याजवळील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पुलावरून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बसने ये-जा करतात. सध्या महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. अशा वेळी पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे एसटी फेऱ्या बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर शेलगाव देशमुख रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. पुलावरील भगदाड आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या दुरवस्थेकडे आणि रस्त्याच्या खराब अवस्थेकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने धोका आणखी वाढला आहे.
शेलगाव देशमुख येथील वसंतराव देशमुख यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ पुलावरील भगदाड बुजवून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. पुलावरील पडलेले भगदाड आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सेवा सुरळीत सुरू राहील याची हमी द्यावी, अशी मागणी होत आहे.
आता या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते, तसेच तातडीने कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

