illegal drug sales : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध औषध विक्री, कालबाह्य औषधांचा साठा आणि विना-परवाना मेडिकल स्टोअर्सविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पत्रकार माधव अशोकराव देशमुख यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे.

परवान्याशिवाय मेडिकल स्टोअर्सचा मुद्दा ऐरणीवर; प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
संग्रामपूर : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध औषध विक्री, कालबाह्य औषधांचा साठा आणि विना-परवाना मेडिकल स्टोअर्सविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पत्रकार माधव अशोकराव देशमुख यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे.
वृत्तपत्रामध्ये अनेक वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तालुक्यात अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये परवानाधारक फार्मासिस्टशिवाय औषध विक्री सुरू असून काही दुकाने भाड्याने परवाना घेऊन चालवली जात आहेत. हा प्रकार औषध व प्रसाधने कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
देशमुख यांनी विशेषतः कोडीनयुक्त सिरप, झोपेच्या गोळ्या आणि गर्भपाताच्या औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय होत असलेली विक्री हा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. अशा प्रकारामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत असून, सार्वजनिक आरोग्यावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
अन्न व औषध प्रशासनावर टीका करताना त्यांनी सांगितले की, केवळ कार्यशाळा आयोजित करून औपचारिकता पूर्ण केली जात आहे; मात्र प्रत्यक्षात धाडी टाकून कठोर कारवाई केली जात नसल्याने दोषींना मोकळीक मिळत आहे.
त्यांनी संशयित मेडिकल स्टोअर्सवर तातडीने धाडी टाकाव्यात, नियमभंग करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत, दोषींवर गुन्हे दाखल करून नावे जाहीर करावीत, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने १ एप्रिल २०२६ पर्यंत ठोस पावले उचलली नाहीत, तर १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, वानखेड येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

