unseasonal rains : गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मूग, तीळ आदी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी; रब्बी पिकांना फटका, आंबा उत्पादक संकटात
संजय तायडे
बोरगाव मंजू : गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मूग, तीळ आदी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
यावर्षी खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत सापडले होते. खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आर्थिक जुळवाजुळव करून रब्बी पिकांची लागवड केली होती. पिके आता काढणीच्या टप्प्यावर आली असतानाच ३० मार्च रोजी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पिके घरात येण्याआधीच नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबा उत्पादक शेतकरी संकटात
सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे आंब्याच्या झाडांवरील कच्चे आणि अर्धपिकले फळ मोठ्या प्रमाणात खाली पडले. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी जाणारा माल वाया गेला असून आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.बोरगाव मंजूसह वाशिंबा, डोंगरगाव, अन्वी, मिर्झापूर, वणी, रंभापूर, पळसो, सोनाळा, काटेपुर्णा या परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बाभुळगाव जहांगीर येथे विजेचा कहर
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बाभुळगाव जहांगीर येथील ढोमणे यांच्या शेतातील बांबूवर वीज कोसळल्याने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

