Crop Loan Waiver : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज तातडीने माफ करण्याच्या मागणीसाठी अडोळीत सोमवार, ६ एप्रिल रोजी वाशिम–रिसोड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘गाव विक्री’चा निर्णय घेणाऱ्या अडोळीतील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत वाशिम–रिसोड मार्ग काही काळासाठी ठप्प केला. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती.

अडोळी : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज तातडीने माफ करण्याच्या मागणीसाठी अडोळीत सोमवार, ६ एप्रिल रोजी वाशिम–रिसोड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘गाव विक्री’चा निर्णय घेणाऱ्या अडोळीतील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत वाशिम–रिसोड मार्ग काही काळासाठी ठप्प केला. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती.
गत २ एप्रिलपासून अडोळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. तहसीलदारांसह विविध अधिकारी आणि खासदारांनी गावाला भेट दिली असली तरी, ‘राज्य शासनातील जबाबदार प्रतिनिधी येऊन आमच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,’ असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रस्ता रोकोदरम्यान शेतकऱ्यांनी ‘सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे वाशिम–रिसोड मार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात युवा शेतकरी सतीश इढोळे, बालाजी मोरे, सोनुताई मुळे, प्रविण मते, नामदेव पतंगे, बालाजी पडेल, मनोहर सावके, शांतीराम भालके, राजेंद्र खोलगाडे, समाजसेवक राजकुमार पडघान, दौलत पडघान, रामेश्वर खंडारे, शाळीग्राम इढोळे, भागवत इढोळे, वसंतराव इढोळे, गजानन इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अडोळी गावाचा हा लढा आता केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या व्यापक प्रश्नांचे प्रतीक बनत चालला असून, शासन या आंदोलनाची दखल कशी घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अडोळी गावातील ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. ‘सरसकट कर्जमाफीशिवाय माघार नाही’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाच्या भेटीनंतरही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला असून, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

