Farmer Commits Suicide : येथील माळीपेठ भागातील एका शेतकऱ्याने राहत्या घरात पंख्याला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१ मार्च) दुपारी सुमारे ४ वाजता घडली. मृत शेतकऱ्याचे नाव संतोष शंकर खरात (वय ४७) असे आहे.

साखरखेर्डा : येथील माळीपेठ भागातील एका शेतकऱ्याने राहत्या घरात पंख्याला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१ मार्च) दुपारी सुमारे ४ वाजता घडली. मृत शेतकऱ्याचे नाव संतोष शंकर खरात (वय ४७) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खरात यांच्या नावे सुमारे १ हेक्टर ६२ आर शेती असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. कुटुंबात आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. आई, पत्नी आणि संतोष हे स्वतःच्या शेतात काम करत असतानाच इतर शेतातही मजुरी करून कुटुंबाचा खर्च भागवत होते.
मुलींचे विवाह झाले असून एका मुलीचा विवाह एक महिन्यापूर्वीच झाला होता. केवळ चार एकर शेतीवर अवलंबून असलेल्या संतोष यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती; मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. या विवंचनेतून त्यांनी दुपारी सुमारास घरातील पंख्याला दोर लावून गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती माळीपेठ परिसरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संतोष यांनी आत्महत्या केल्याचे समजताच ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे यांनी प्राथमिक अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे सादर केला आहे. तसेच ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बाजीराव खरात यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

