The Politics :निवडणुकीनंतरचा राजकीय संघर्ष आता ‘पत्रकार परिषदांच्या राजकारणा’तून अधिक तीव्र होत असल्याचे चित्र मेहकरमध्ये दिसत आहे. माजी आमदार संजय रायमूलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या गटांतील वाद सार्वजनिक पातळीवर येत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे स्थानिक राजकारण तापले आहे.

श्रेयवादावरून आजी-माजी आमने-सामने; वातावरण तापले
मेहकर : निवडणुकीनंतरचा राजकीय संघर्ष आता ‘पत्रकार परिषदांच्या राजकारणा’तून अधिक तीव्र होत असल्याचे चित्र मेहकरमध्ये दिसत आहे. माजी आमदार संजय रायमूलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या गटांतील वाद सार्वजनिक पातळीवर येत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे स्थानिक राजकारण तापले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्प मताधिक्याने झालेल्या पराभवानंतरही माजी आमदारांच्या गटाने आपली राजकीय भूमिका कायम ठेवली आहे. दुसरीकडे, विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखालील गटाने नगरपालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला, तरी पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यात अडचणी येत असल्याचे दिसते. विकासकामांच्या श्रेयावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिकच वाढला आहे. माजी आमदारांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांवर विद्यमान आमदारांनी दावा करू नये, असा आरोप विरोधी गटाकडून सातत्याने केला जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना सत्ताधारी गटाकडूनही आक्रमक भूमिका घेतली जात असून, ‘जशास तसे उत्तर’ देण्याचे संकेत दिले जात आहेत.
गेल्या काही दिवसांत दोन्ही गटांकडून वारंवार पत्रकार परिषदांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून एकमेकांवर टीका-प्रत्युत्तरांचा भडिमार होत असून, स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण अधिकच ताणले गेले आहे. या प्रकारामुळे राजकारणाची पातळी खालावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. राजकीय मतभेद असले तरी विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याची अपेक्षा असताना, सध्या आरोप-प्रत्यारोपांवरच अधिक भर दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेहकरच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पदाची जबाबदारी आणि सार्वजनिक मर्यादा लक्षात घेता आजी-माजी नेत्यांनी संयम बाळगावा, तसेच कार्यकर्त्यांनाही आवर घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अखेर नागरिकांचा एकच सवाल पुढे येत आहे—विकासाला प्राधान्य की ‘पत्र परिषदांचे राजकारण’?

