Subodh Savji : महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात अनुदान परत घेतले जाणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण तापले असून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लाडक्या बहिणींकडून दिलेले अनुदान वसूल करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेवरून राजकारण तापले; २६ लाख महिलांचे मानधन बंद होणार?
डोणगाव : महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात अनुदान परत घेतले जाणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण तापले असून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लाडक्या बहिणींकडून दिलेले अनुदान वसूल करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सुरू आहे. शासन २६ लाख लाभार्थी महिलांचा लाभ बंद करणार असून दिलेले अनुदान परत घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सावजी यांनी सरकारवर टीका केली आहे.पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील महिलांनी शासनाच्या आवाहनावर विश्वास ठेवून कोणत्याही अटी-शर्तींशिवाय या योजनेचा लाभ स्वीकारला होता. आता अचानक योजना बंद करणे आणि दिलेले अनुदान परत मागणे हे अत्यंत दुर्दैवी असून महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. “कोणत्याही लाडक्या बहिणीकडून दिलेले अनुदान वसूल करू नये. महिलांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर आर्थिक ताण टाकणे म्हणजे एक प्रकारची फसवणूकच आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
यासोबतच शासनाने लागू केलेली केवायसीची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली होती का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याचे कारण पुढे करून महिलांचे मानधन रोखणे योग्य नसल्याचे सांगत, हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी आग्रही मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे.

