Black Gudi : धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात देऊळगाव मही येथे सकल धनगर समाजाने काळी गुढी उभारून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या प्रतीकात्मक आंदोलनातून “आश्वासनांची फसवणूक आता चालणार नाही,” असा थेट इशारा देत समाजाने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

मागण्या रखडल्याने रोष उसळला; देऊळगाव महीत काळ्या गुढीने निषेध
देऊळगाव मही : धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात देऊळगाव मही येथे सकल धनगर समाजाने काळी गुढी उभारून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या प्रतीकात्मक आंदोलनातून “आश्वासनांची फसवणूक आता चालणार नाही,” असा थेट इशारा देत समाजाने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित असून, शासनाकडून केवळ आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे समाजात असंतोष टोकाला पोहोचला असून, आता हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे १६ तारखेपासून सुरू केलेल्या अमरण उपोषणाकडे सरकारकडून पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. आंदोलनस्थळी कोणतेही शासकीय शिष्टमंडळ पाठवले गेले नसल्याने संताप आणखी तीव्र झाल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
देऊळगाव महीत उभारण्यात आलेली काळी गुढी ही शासनाच्या उदासीनतेविरोधातील तीव्र प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. राज्यभरात धनगर समाज एकवटत असून, विविध ठिकाणी अशाच प्रकारे निषेध नोंदवला जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले की, शासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या काळात अधिक व्यापक आणि उग्र आंदोलन उभारले जाईल. या परिस्थितीस पूर्णतः शासनच जबाबदार राहील, असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे.

