Demand for fair investigation : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सकल ओबीसी व वंजारी समाज बांधवांनी केली आहे.

रमेश खंडागळे
बीबी : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सकल ओबीसी व वंजारी समाज बांधवांनी केली आहे.
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी बीबी येथे झालेल्या सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पुतळा वादानंतर अनेक निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप करत, त्यांची तात्काळ मुक्तता करावी व बिनशर्त गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सभेतून करण्यात आली.
सभेची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. यावेळी माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार तोताराम कायंदे, सविताताई मुंडे, विनोद वाघ व सुभाष दराडे उपस्थित होते. विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसआयटी चौकशीची मागणी
सभेत वक्त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. “कर्नाटक ते जिंजीपर्यंत शिवराय सर्वांच्या हृदयात आहेत; त्यांच्या पुतळ्याला कोणत्याही समाजाचा विरोध असू शकत नाही,” असे मत व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना काही विद्यार्थ्यांना अटक झाल्याचा आरोप करत, त्यांचा शोध घेऊन परीक्षेला हजर होण्याची संधी द्यावी, अशी मागणी सविताताई मुंडे यांनी केली. व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असेही काही वक्त्यांनी नमूद केले.
सामाजिक सलोख्याचे आवाहन
काही वक्त्यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये व जातीपातीचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करू नये, असे आवाहन केले. शिवरायांचा पुतळा उभारण्यास गावातील नागरिकांचा पाठिंबा असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्गणीही जमा झाल्याचा दावा करण्यात आला.
पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप तपासावा, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही सभेतून झाली. माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांनी सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता.
चिखला काकड येथील महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ चिखलीत कडकडीत बंद

