Cyber safety lesson: मोबाईलचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, वाढते सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने देऊळगाव राजा हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. १७ जुलै) सायबर जनजागृती व दामिनी पथकाच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायबर गुन्हे, सोशल मीडिया आणि महिला सुरक्षा; विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम
गजानन तिडके
देऊळगाव राजा : मोबाईलचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, वाढते सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने देऊळगाव राजा हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. १७ जुलै) सायबर जनजागृती व दामिनी पथकाच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुख काकडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मोबाईलचा अयोग्य वापर, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क तसेच वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण यामुळे अनेक विद्यार्थी सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत असल्याचे सांगितले. अशा घटनांमुळे शैक्षणिक नुकसान, मानसिक ताण आणि विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
प्रवासादरम्यान किंवा दैनंदिन जीवनात छेडछाड, त्रास अथवा अन्यायाचा सामना करावा लागल्यास भीती न बाळगता तात्काळ महिला हेल्पलाइन क्रमांक १०९१, आपत्कालीन सेवा ११२ किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य आर. बी. कोल्हे होते. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन, शालेय शिस्त आणि सुरक्षित, जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पेरणे यांनी केले, तर उपप्राचार्य डी. व्ही. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, मोबाईलचा जबाबदारीने वापर आणि महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती निर्माण झाली.

