Citizens rush for birth and death certificates : जन्म व मृत्यू दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संजय शेषराव उमाळे यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले आहे. या मागणीला एम. एस. गाडेकर व देवानंद इंगळे यांनीही समर्थन दिले आहे.

सहा महिन्यांपासून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी
ज़ाकिर अहमद
बाळापूर : जन्म व मृत्यू दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संजय शेषराव उमाळे यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले आहे. या मागणीला एम. एस. गाडेकर व देवानंद इंगळे यांनीही समर्थन दिले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून अनेक अर्ज प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बाळापूर नगर परिषदेमार्फत तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू नोंदीसाठी अर्ज सादर करण्यात येतात. मात्र अनेक अर्ज अद्यापही मंजूर झालेले नाहीत. यामध्ये घरगुती जन्म, घरी झालेला मृत्यू, अपघाती मृत्यू, आत्महत्येची प्रकरणे तसेच नगर परिषदेकडे कोणतीही पूर्वनोंद नसलेल्या घटनांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, जन्म किंवा मृत्यूची कोणतीही नोंद नसलेल्या प्रकरणांमध्ये नियमानुसार कालावधीत दाखले देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घरगुती जन्म, मृत्यू, अपघाती मृत्यू किंवा आत्महत्येसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन संबंधितांना प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
या दाखल्यांअभावी अनेक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याने त्यांची आर्थिक व सामाजिक अडचण वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टीकोन ठेवून प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

