Maharajasva Samadhan Abhiyan : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान” टप्पा एक शिबिराला नागरिक आणि शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री जागेश्वर विद्यालयात शुक्रवारी, ८ मे रोजी हे शिबिर पार पडले.

वाडेगावात महसूल प्रशासनाचे शिबिर; शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान” टप्पा एक शिबिराला नागरिक आणि शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री जागेश्वर विद्यालयात शुक्रवारी, ८ मे रोजी हे शिबिर पार पडले.
बाळापूर तहसील कार्यालयाच्या वतीने उरळ, पारस, निंबा, हातरून, व्याळा आणि वाडेगाव येथे या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार वैभव फरतारे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल मानकर , सरपंच मंगेश तायडे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर सरप , दीपक मसने तसेच नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी “महाराजस्व समाधान अभियान” या उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
शिबिरात महसूल, कृषी आणि इतर विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिक आणि शेतकरी बांधवांनी आपल्या विविध अडचणी आणि तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यापैकी बहुतांश तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.यावेळी महिला बचतगटांच्या वतीने विविध उत्पादनांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. त्यामुळे शिबिराला ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
“वाडेगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराला नागरिक आणि शेतकरी बांधवांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला,” अशी माहिती तहसीलदार वैभव फरतारे यांनी दिली.

