Census drive : बारा बलुतेदार समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात न्याय मिळावा, रोहिणी आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात तसेच समाजाला सत्ताकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी बारा बलुतेदार समाजाने राज्यव्यापी जनजागृती आणि संघटनात्मक मोहिमेची तयारी सुरू केली आहे. यासाठी गावागावांत जाऊन समाजाची मोजणी आणि जागृती मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अकोला येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचे प्रतिनिधित्व द्या; बारा बलुतेदार समाज आक्रमक
अकोला : बारा बलुतेदार समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात न्याय मिळावा, रोहिणी आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात तसेच समाजाला सत्ताकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी बारा बलुतेदार समाजाने राज्यव्यापी जनजागृती आणि संघटनात्मक मोहिमेची तयारी सुरू केली आहे. यासाठी गावागावांत जाऊन समाजाची मोजणी आणि जागृती मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अकोला येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. रामदास गाडेकर होते, तर गजानन उगवेकर यांनी बैठकीचे संचालन केले. यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करताना बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
वक्त्यांनी सांगितले की, राज्यातील बारा बलुतेदार समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नाही. समाजाची लोकसंख्या सुमारे ३३ टक्के असल्याचा दावा करत, प्रत्यक्ष राजकारणात मात्र एक टक्क्यापेक्षाही कमी प्रतिनिधित्व मिळत असल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक स्थिती आणि वास्तव परिस्थिती शासनासमोर मांडण्यासाठी गावागावांत जाऊन व्यापक मोजणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी काळात विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत रोहिणी आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. समाजातील विविध घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत गजानन धामणकर, गजानन वाघमारे, संतोष सरोदे, रामभाऊ येवतकर, अनिल शिंदे तसेच महिला अध्यक्षा सुनीता सरोदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी समाज संघटन, युवकांचा सहभाग आणि महिलांच्या नेतृत्ववाढीवर विशेष भर दिला.
यावेळी प्रा. शेषराव शिंदे, राजेंद्र चंदूरकर, निलेश खडसान, नागेश ठाकरे, गणेश खोपे, संतोष पंडित, गणेश वडतकर, श्रीकृष्ण अकोटकर, मंगेश सावरकर, गजेंद्र पुणकर, रुपेश भोलावंकर, सुनील कौस्कार, प्रकाश चंदूरकर, मोतीराम अठराळे, गजानन वाघमारे, अनिल वयकर, राजू राजुरकर, राजू श्रीवास्तव, निरुटू रुद्राकर, राम चवरे, विठ्ठल रुद्राकर, विठ्ठल बलावलकर, शंकर कंकाळ यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गावपातळीवर समित्या स्थापन करणे, युवक व महिलांचा सहभाग वाढविणे, समाजाची संघटनात्मक ताकद मजबूत करणे आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारा बलुतेदार समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

