Campus turns lush green :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत नारायणराव नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वनमहोत्सवानिमित्त ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ तसेच ‘एक पेड़ माँ के नाम’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक वातावरणात झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

वृक्षसंवर्धनाची जाणीव रुजवणारा उपक्रम; नारायणराव नागरे महाविद्यालयात वनमहोत्सव साजरा
बाजीराव वाघ
दुसरबीड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत नारायणराव नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वनमहोत्सवानिमित्त ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ तसेच ‘एक पेड़ माँ के नाम’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक वातावरणात झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराते तसेच संत भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ, रूम्हणा संस्थेचे संस्थाध्यक्ष व माजी आमदार तोतारामजी कायंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयजी नागरे हे होते. ते अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून दुसरबीड येथील ज्येष्ठ पत्रकार शेख गुलशेरभाई तसेच प्रतिष्ठित पालक व नागरिक शालिग्राम शिवाजी मुरकुट (डोरवी) उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विजयजी नागरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्याने राबविण्यात येत असून, आज हे महाविद्यालय ‘वनराई फुलवणारे महाविद्यालय’ म्हणून परिसरात ओळखले जाते.
यावेळी प्रमुख पाहुणे शालिग्राम शिवाजी मुरकुट यांनी मनोगतात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मी माझ्या शेतातील एकही झाड आजपर्यंत तोडलेले नाही. झाडे ही देवासमान आहेत. ती मानवाला प्राणवायू, सावली, औषधे, फळे आणि पर्यावरणाचा समतोल देतात. झाडांची तोड वाढल्यास तापमान वाढते, सजीवसृष्टी धोक्यात येते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विजयजी नागरे यांनी महाविद्यालयाच्या पर्यावरण संवर्धनातील कार्याचा आढावा घेतला. “दहा वर्षांपूर्वी या महाविद्यालयाच्या परिसरात एकही वृक्ष नव्हता. खडकाळ आणि ओसाड जागेत मोठ्या परिश्रमाने वृक्षलागवड करण्यात आली. सातत्याने संगोपन केल्यामुळे आज येथे शेकडो वृक्षांची हिरवीगार वनराई उभी राहिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच वृक्षतोडीमुळे तापमानवाढ, पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारखे गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फळझाडे, औषधी वनस्पती आणि सावलीची रोपे आणून वृक्षारोपणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश यादव यांनी केले. त्यांनी वनमहोत्सवाचे महत्त्व विशद करत प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कु. प्राची गजानन सांगळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. देशमाने, प्रा. तारे, प्रा. देवानंद नागरे, प्रा. शेख युनूस शेख अहमद, प्रा. मिलिंद, श्री. अनिल रणमळे, श्री. अनिल गायकवाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

