17 Pakistani soldiers captured : बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने रविवारी दावा केला की त्यांनी १७ पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी १० जणांना मुक्त करण्यात आले असून उर्वरित ७ जण अजूनही कैदेत ठेवले आहेत. या कैद्यांच्या बदल्यात बलूच लढवय्यांची सुटका करण्यासाठी पाकिस्तान सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.

इस्लामाबाद :बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने रविवारी दावा केला की त्यांनी १७ पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी १० जणांना मुक्त करण्यात आले असून उर्वरित ७ जण अजूनही कैदेत ठेवले आहेत. या कैद्यांच्या बदल्यात बलूच लढवय्यांची सुटका करण्यासाठी पाकिस्तान सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.
हा दावा BLAच्या ‘हक्काल’ या मीडिया विंगच्या कथित निवेदनातून करण्यात आला. मात्र, पाकिस्तानची सेना किंवा सरकारकडून याबाबत तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
BLAचे प्रवक्ते जीयंद बलूच यांनी याला ‘ऑपरेशन हेरोफ’चा दुसरा टप्पा म्हटले आहे. BLAच्या म्हणण्यानुसार, मुक्त करण्यात आलेले १० जण बलूच असून ते स्थानिक पोलिसांशी संबंधित होते. त्यांना इशारा देऊन सोडण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. उर्वरित ७ जण पाकिस्तानच्या नियमित सैन्य युनिटचे सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांना कथित ‘बलूच नॅशनल कोर्ट’मध्ये हजर करण्यात आले, जिथे सामान्य नागरिकांवरील कारवाई, जबरदस्तीने बेपत्ता करण्यास मदत आणि बलूच लोकांविरोधातील नरसंहारात सहभाग असे आरोप ठेवण्यात आले.
BLAच्या मते, सुनावणीदरम्यान आरोपींना उत्तर देण्याची संधी देण्यात आली, पुरावे सादर करण्यात आले आणि निवेदने नोंदवली गेली. त्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले. तरीही इस्लामाबादला औपचारिक कैदी अदलाबदलीची इच्छा व्यक्त करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
‘ऑपरेशन हेरोफ’ काय?
BLAने २५-२६ ऑगस्ट २०२४ च्या रात्री बलूचिस्तानमध्ये मोठा समन्वित हल्ला केला होता. या कारवाईला ‘ऑपरेशन हेरोफ’ असे नाव देण्यात आले. बलूच भाषेत ‘हेरोफ’चा अर्थ ‘वादळ’ असा होतो. या ऑपरेशनदरम्यान बलूचिस्तानातील दहा पेक्षा अधिक जिल्ह्यांत एकाच वेळी हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी सुरक्षा दल, पोलीस, पंजाब प्रांतातील कामगार तसेच पूल-महामार्गांसारखी पायाभूत सुविधा हे प्रमुख लक्ष्य होते. मुसाखेल, कलात, बेला, मस्तुंग, बोलान आणि तुर्बत ही प्रमुख प्रभावित क्षेत्रे होती.माध्यमांच्या अहवालांनुसार या हल्ल्यात किमान ७३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ३१ सुरक्षा कर्मचारी, ३३ नागरिक आणि १४ हल्लेखोरांचा समावेश होता. BLAने या कारवाईत सुमारे ८०० लढवय्ये सहभागी झाल्याचा आणि १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला असला, तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

