Sandeep Shelke joins Congress : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला.

बुलढाणा : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रवक्ते सचिन सावंत तसेच अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून संदीप शेळके उद्धवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि त्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धवसेनेला जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘वन बुलढाणा मिशन’ मोहिमेद्वारे शेळके यांनी उद्धवसेनेच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या पक्षांतरामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करताना संदीप शेळके यांनी शिव, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसची वाट निवडल्याचे सांगितले. काँग्रेस हा शोषित-वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष असून संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या विचारधारेतून आपण पक्षात प्रवेश केला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षासाठी झोकून काम करण्याचे आश्वासन देत त्यांनी “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” असा नारा दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी राज्यभर सामाजिक व संघटनात्मक काम केले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षसंघटनाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनीही शेळके यांच्या कार्याचा उल्लेख करत “वन बुलढाणा मिशन”द्वारे त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मजबूत नेटवर्क उभे केले असून त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असे सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला वासुदेव अंबादास पाटील, विलास वायझोडे, गजानन पाटील, विनोद जुनारे, किसनराव धामोडे, गजानन परहाड, भागवत दाभाडे, अनिल ढगे, राम पाटील, इरफान पठाण, अॅवड. मोहतेशम, अॅेड. जावेद कुरेशी, मोहम्मद वसीम, अजहर देशमुख, जाकिर मेमन, गजफर खान, प्रदीप शेळके, एकनाथ शेळके यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, संदीप शेळके यांच्या या पक्षांतरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात आणखी राजकीय हालचाली घडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

