Appoint Rahul Kankal : नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राहुल कस्तुरा दिलीप कंकाळ यांना केवळ प्रभारी न ठेवता नियमित व कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून बाळापूरमध्येच कार्यरत ठेवावे, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, जागरूक नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू आहे.

विकासकामांच्या सातत्यासाठी राहुल कंकाल यांनाच संधी द्या; बाळापूरकरांची प्रशासनाकडे हाक
बाळापूर : नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राहुल कस्तुरा दिलीप कंकाळ यांना केवळ प्रभारी न ठेवता नियमित व कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून बाळापूरमध्येच कार्यरत ठेवावे, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, जागरूक नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू आहे.

नगर परिषद प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि विकासकामांना गती देणारे अधिकारी म्हणून राहुल कंकाल यांची ओळख निर्माण झाली असून, त्यांना बाळापूरमध्येच कायम ठेवावे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
राहुल कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जलपुरवठा अधिकारी संजय मोकासकर आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध भागांत प्रत्यक्ष जाऊन पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी केली. रंगार हट्टीसरा, लक्ष्मी मंदिर परिसर, मोठा मोमीनपुरा, डांगपुरा, कालेखानीपुरा, बेलदारपुरा खानका, शतरंजीपुरा, नवनगर त्रिमूर्ती, ठाकूरपुरा, खामगाव नाका, जावळीबासे, बलोचपुरा आणि लोटनापूर या भागांमध्ये पाणीपुरवठा व पाण्याच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली.
मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिक भेट व जनसुनावणीचा वेळ निश्चित केला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत असून, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
राहुल कंकाल हे मूळतः प्रधानाचार्य पदावर कार्यरत असून, त्यांना पदोन्नती मिळाल्याची माहिती आहे. मात्र, शहरातील नागरिक, शिक्षक आणि कर्मचारी यांचे मत आहे की विकासकामांच्या सातत्यासाठी आणि जनहितासाठी त्यांना बाळापूर नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणूनच कार्यरत ठेवावे.
अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे मत आहे की सुरू असलेली विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनात स्थैर्य आवश्यक आहे. काही विद्यमान व माजी नगरसेवकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, पारदर्शक प्रशासन आणि तातडीने समस्या सोडविण्याच्या क्षमतेमुळे नागरिकांचा विश्वास वाढल्याचे सांगितले.
झुबैर अहमद, शेख सलीम मिस्त्री, शेख सलमान, अब्दुल नईम, मोहम्मद असगर, शाकिर अहमद तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या विनंतीनंतर हा विषय संपूर्ण शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य आणि नगरविकासाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनात बदल झाल्यास विकासकामांच्या गतीवर परिणाम होऊ शकतो, असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे राहुल कंकाल यांची बाळापूरमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशी एकमुखी मागणी होत असून आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

