Nandatai Kayande :रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानयंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद रिक्त झाले आहे. या पदावर मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील जिजाऊंची लेक म्हणून ओळख असलेल्या नंदाताई देवानंद कायंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मोहम्मद नासेर अब्दुल रज्जाक यांनी केली आहे. त्यांनी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे.

नगरसेवक मोहम्मद नासेर यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
देऊळगाव राजा : रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानयंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद रिक्त झाले आहे. या पदावर मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील जिजाऊंची लेक म्हणून ओळख असलेल्या नंदाताई देवानंद कायंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मोहम्मद नासेर अब्दुल रज्जाक यांनी केली आहे. त्यांनी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे.

नगरसेवक नासेर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातृतीर्थ सिंदखेडराजा हे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असून या पवित्र भूमीत गेल्या चार दशकांपासून नंदाताई कायंदे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत जिल्ह्याच्या विकासाला प्रेरणादायी दिशा दिली आहे. तसेच श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी, महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि बचत गटांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा उभारला आहे.
विशेषतः महिलांसाठी नर्सिंग कॉलेज उभारणी, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्य महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सामाजिक जाणिवेतून सलग ४० वर्षे काम करण्याचा त्यांचा अनुभव राज्य महिला आयोगासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महिलांच्या उत्कर्षासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नंदाताई देवानंद कायंदे यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवेदनावर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या मागणीला स्थानिक पातळीवर महत्त्व आले आहे.

