Agriculture Devastated by Hailstorm :रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी आलेली असतानाच जिल्ह्यात बुधवारी व शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील २०१ गावांमधील सुमारे ३,८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

११ तालुक्यांतील ३८०२ हेक्टर पिकांचे नुकसान, पंचनाम्यांचे आदेश
बुलढाणा : रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी आलेली असतानाच जिल्ह्यात बुधवारी व शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील २०१ गावांमधील सुमारे ३,८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. देऊळगाव राजा, लोणार आणि चिखली तालुक्यांत गारपिटीचा मोठा फटका बसला. लोणार तालुक्यातील अजिसपूर मंडळात गारपिटीची तीव्रता सर्वाधिक नोंदविण्यात आली.
या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, केळी, पपई, बाजरी, चिया, संत्रा, मोसंबी व आंबा या विविध पिकांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा व मेहकर तालुक्यांत तुलनेने नुकसान कमी असल्याची माहिती आहे.
वीज पडून युवकाचा मृत्यू
गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास शेगाव तालुक्यातील आळसणा परिसरातील खेर्डा शिवारात वीज कोसळून आबा हिरामण माळी (वय १९) यांचा मृत्यू झाला. ही घटना सुभाष येरळीकर यांच्या शेतात घडली. मृत युवक हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील रहिवासी होता. या दुर्घटनेत भास्कर शिंगाडे यांच्या दोन मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मलकापूरमध्ये सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे बुलढाणा – १४ गावे, १४५ हेक्टर, चिखली – १८ गावे, ७१२ हेक्टर, मोताळा – १६ गावे, १०२ हेक्टर, मलकापूर – ४२ गावे, ७४० हेक्टर (सर्वाधिक), खामगाव – २० गावे, १४८ हेक्टर, शेगाव – २ गावे, २१० हेक्टर, नांदुरा – १५ गावे (माहिती अपूर्ण), जळगाव जामोद – ४१ गावे, १५० हेक्टर, संग्रामपूर – ११ गावे, ७० हेक्टर, लोणार – १० गावे, १९० हेक्टर आणि देऊळगाव राजा – १२ गावे, ५३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तापमानात वाढीची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी आठवडा कोरडा राहण्याची शक्यता असून तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. डोणगाव परिसरात पावसादरम्यान विजांच्या कडकडाटाचे प्रमाण अधिक असल्याचेही निदर्शनास आले.

