three female devotees died: अधिक मासानिमित्त गोदावरी नदीकाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना आज पुरुषोत्तम पुरी येथे भरधाव बोट नदीपात्रात उलटली. या दुर्घटनेत तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन भाविकांचा समावेश आहे. प्रयागबाई अश्रोबा डोळे (वय 70) रा.कुंभेफळ व प्रमीला शेषराव राठोड (वय 55) रा. बिबी अशी मृतक महिला भाविकांची नावे आहेत. या अपघातात कांता ज्ञानदेव आंधळे यांचाही मृत्यू झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा मृतकांमध्ये समावेश ; अधिक मासानिमित्त झाली होती गर्दी
अशोक इंगळे
साखरखेर्डा : अधिक मासानिमित्त गोदावरी नदीकाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना आज पुरुषोत्तम पुरी येथे भरधाव बोट नदीपात्रात उलटली. या दुर्घटनेत तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन भाविकांचा समावेश आहे. प्रयागबाई अश्रोबा डोळे (वय 70) रा.कुंभेफळ व प्रमीला शेषराव राठोड (वय 55) रा. बिबी अशी मृतक महिला भाविकांची नावे आहेत. या अपघातात कांता ज्ञानदेव आंधळे यांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे दर्शन आणि धार्मिक विधींसाठी हजारो भाविक दाखल झाले होते. याचदरम्यान गोदावरी नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट अचानक असंतुलित झाली आणि काही क्षणांतच उलटली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आल्याने बोटीचा तोल गेला आणि ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बोट उलटताच नदीत एकच गोंधळ उडाला. महिला, पुरुष आणि वृद्ध भाविक जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले. अनेक जण पाण्यात फेकले गेल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ नदीत उड्या घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या धाडसी आणि वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार ते पाच जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.या बोटीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या 10 ते 12 महिला भाविक बसलेल्या होत्या. त्यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अधिक मासानिमित्त लाखो रुपयांचा खर्च करून विविध सुविधा उपलब्ध केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात नदी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे आता भाविकांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

