Tragedy strikes : नदी ओलांडत असताना बैलगाडी खोल खड्ड्यात कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने चार बैलांचा मृत्यू झाला, तर शाहिद असिफ देशमुख (वय २५) हा युवक प्रवाहात वाहून जाऊन बेपत्ता झाला आहे. त्याच्यासोबत असलेल्या अबुतालेब या युवकाचा ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला. ही घटना लोहारा येथील मन नदीत शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.

रेती उत्खननाच्या खड्ड्यांचा बळी? मन नदीतील अपघाताने संताप; २५ वर्षीय युवकाचा शोध सुरू
लोहारा : नदी ओलांडत असताना बैलगाडी खोल खड्ड्यात कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने चार बैलांचा मृत्यू झाला, तर शाहिद असिफ देशमुख (वय २५) हा युवक प्रवाहात वाहून जाऊन बेपत्ता झाला आहे. त्याच्यासोबत असलेल्या अबुतालेब या युवकाचा ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला. ही घटना लोहारा येथील मन नदीत शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, शेतीचे काम आटोपून दोघे युवक बैलगाडीसह घराकडे परतत होते. मन नदी ओलांडत असताना नदीपात्रात पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने खोदण्यात आलेल्या सुमारे २० ते २० फूट खोल खड्ड्यात बैलगाडी अचानक गेली. त्यामुळे बैलगाडीने सलग तीन कोलांट्या घेत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या भीषण अपघातात चारही बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर शाहिद असिफ देशमुख हा युवक पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. उरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने बेपत्ता युवकाचा शोध सुरू केला असून, युद्धपातळीवर बचाव व शोधकार्य सुरू आहे.
दरम्यान, नदीपात्रात अवैध रेती उत्खननासाठी पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यांमुळेच हा भीषण अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि रेती उत्खननाचा संबंध याबाबत अधिकृत तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.

