RTO cracks down: जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक आणि वैधता संपलेल्या वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच दिवशी दोन खाजगी बस आणि 20 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली.

अकोल्यात आरटीओची विशेष तपासणी मोहीम सुरू; शंभरहून अधिक वाहनांची तपासणी
आगाखान पठाण
अकोला : जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक आणि वैधता संपलेल्या वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच दिवशी दोन खाजगी बस आणि 20 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली.
अकोला आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, नव्याने रुजू झालेले उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शहरातील टॉवर चौक, मध्यवर्ती बसस्थानक आदी ठिकाणी विशेष तपासणी करण्यात आली. वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक किरणकुमार लोणे, अनिरुद्ध देवधर, संदीप तायडे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद जाधव आणि ममता इंगोले यांच्या पथकाने शंभरहून अधिक वाहनांची तपासणी केली. तपासणीत परवाना, फिटनेस, विमा, कर भरणा आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
तपासणीत अनेक वाहनांची वैधता संपल्याचे तसेच काही वाहने अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दोन खाजगी बस आणि 20 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी 11 ऑटो रिक्षा आणि 2 खाजगी बस जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली.
आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले की, जिल्ह्यात अवैध वाहतूक करणाऱ्या तसेच फिटनेस, विमा, परवाना किंवा अन्य आवश्यक कागदपत्रांची वैधता संपलेल्या वाहनांविरुद्ध ही विशेष मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत.
दरम्यान, सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर भरणा आणि अन्य परवान्यांची मुदत वेळेत नूतनीकरण करून वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे.

