Conduct a re-examination: महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या ५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील शंका दूर होऊन परीक्षेच्या पारदर्शकतेवर विश्वास निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

CET प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी फेरपरीक्षेची मागणी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या ५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील शंका दूर होऊन परीक्षेच्या पारदर्शकतेवर विश्वास निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारानंतर आता MHT-CET परीक्षेबाबतही विविध स्तरांवर संशय व्यक्त केला जात आहे. काही शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून परीक्षेच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, समाजमाध्यमांवर काही कथित ऑडिओ क्लिप, कॉल रेकॉर्डिंग तसेच आकडेवारीसह विविध दावेही व्हायरल होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
सीईटी सेलकडून परीक्षेची प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक असल्याचा दावा केला जात असला, तरी विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी ठोस पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे डॉ. भानुसे यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, सुमारे ४ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांनी MHT-CET परीक्षा दिली असून, सर्वांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी नाही. मात्र, गुणवत्तायादीतील पहिल्या ५ हजार विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतल्यास संपूर्ण प्रक्रियेबाबतचे सत्य स्पष्ट होऊ शकते. यामुळे प्रवेश प्रक्रियेला जास्तीत जास्त एक आठवड्याचा विलंब होईल; मात्र परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होईल, असा दावा त्यांनी केला.
डॉ. भानुसे यांनी पुढे म्हटले आहे की, फेरपरीक्षा घेण्यास नकार दिल्यास संशय अधिक गडद होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासन आणि राज्य सीईटी सेलने पारदर्शक भूमिका घेत आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

