Kashi Vishwanath: श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र चिंचपेंड संस्थान येथील शिवभक्तांचा काशी विश्वनाथाच्या पवित्र जलतीर्थासाठीचा ऐतिहासिक प्रवास गुरुवारी भक्तिमय वातावरणात सुरू झाला. ढोल-ताशांचा गजर ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात आणि भगवान शिवाच्या भव्य पालखी मिरवणुकीसह शिवभक्तांचा जत्था बाळापूर शहरातून उत्साहात रवाना झाला.

काशी ते बाळापूर ३२ दिवसांची पदयात्रा; ४५ वर्षांची परंपरा यंदाही कायम
बाळापूर : श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र चिंचपेंड संस्थान येथील शिवभक्तांचा काशी विश्वनाथाच्या पवित्र जलतीर्थासाठीचा ऐतिहासिक प्रवास गुरुवारी भक्तिमय वातावरणात सुरू झाला. ढोल-ताशांचा गजर ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात आणि भगवान शिवाच्या भव्य पालखी मिरवणुकीसह शिवभक्तांचा जत्था बाळापूर शहरातून उत्साहात रवाना झाला.

तपोवन श्री चिंचपेंड संस्थानच्या या धार्मिक परंपरेला यंदा ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्त उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरातून भगवान शंकरासाठी पवित्र जलतीर्थ आणण्याचा संकल्प पूर्ण करणार आहेत.

यात्रेचा प्रारंभ ६ ऑगस्ट रोजी काशी विश्वनाथ मंदिरातून होणार असून, तेथून सुरू होणारी ३२ दिवसांची पदयात्रा पूर्ण करून ६ सप्टेंबर रोजी शिवभक्त जलतीर्थासह बाळापूर येथे दाखल होणार आहेत. आगमनानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, धार्मिक विधी आणि स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

रवानगीपूर्वी शहरातील विविध भागांत शिवमूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी विविध ठिकाणी फुलवृष्टी करून आणि जयघोष करत यात्रेकरूंचे स्वागत केले. मुख्य चौकात भगवान शिवाची विधिवत पूजा करण्यात आली, तर पोस्ट ऑफिस चौकाजवळ महाआरतीनंतर शिवभक्तांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या पवित्र पदयात्रेत गजानन वानखडे, सुरेश जाफ्राबादी, गजानन जडिये, मनोज इंगळे, नंदू इंगळे, विलास हिवराळे, रोहित जामोदे, राजेंद्र वहिले, अंकुश शिंदे, रामेश्वर सोनकर, अक्षय रौंदळे, सोनू लभाने, अक्षय कांबेकर यांच्यासह अनेक शिवभक्त सहभागी झाले आहेत. श्रावण महिन्यातील ही काशी ते बाळापूर जलतीर्थ पदयात्रा परिसरातील धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जात असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात.

