Complaints regarding soybean: खरीप हंगाम २०२६ मध्ये पातूर तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांमार्फत विक्री करण्यात आलेल्या सोयाबीन आणि कापूस बियाण्यांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी येऊ लागल्याने पातूर तालुका कृषी व्यावसायिक संघाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत कृषी विभागाने तातडीने शेतावर जाऊन पंचनामे करावेत आणि संबंधित बियाणे कंपन्यांना भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

बियाणे कंपन्यांना जबाबदार धरा; पातूर तालुक्यातील कृषी व्यावसायिक संघाचा कृषी विभागाला इशारा
निशांत गवई
पातूर : खरीप हंगाम २०२६ मध्ये पातूर तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांमार्फत विक्री करण्यात आलेल्या सोयाबीन आणि कापूस बियाण्यांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी येऊ लागल्याने पातूर तालुका कृषी व्यावसायिक संघाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत कृषी विभागाने तातडीने शेतावर जाऊन पंचनामे करावेत आणि संबंधित बियाणे कंपन्यांना भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात तालुका कृषी अधिकारी, पातूर यांना १० जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले. पातूर तालुका कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने अध्यक्ष शंकरराव नाभरे आणि सचिव विजय इंगळे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, खरीप हंगामात तालुक्यातील विविध कृषी केंद्रांतून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस बियाण्यांची खरेदी केली होती. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण समाधानकारक न झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, कृषी सेवा केंद्र चालक हे केवळ शासकीय नियमानुसार बियाणे कंपन्यांकडून प्राप्त झालेले सीलबंद बियाण्याचे पाकीट अधिकृत बिलासह शेतकऱ्यांना विक्री करतात. बियाण्यांची निर्मिती, गुणवत्ता तपासणी, प्रक्रिया आणि प्रमाणीकरण यामध्ये विक्रेत्यांचा कोणताही संबंध नसतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणीसंदर्भातील प्रत्येक तक्रारीची जबाबदारी संबंधित बियाणे कंपनीवरच निश्चित केली पाहिजे, अशी भूमिका कृषी व्यावसायिक संघाने घेतली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष कृषी सेवा केंद्र चालकांवर वळण्याची शक्यता असून, प्रत्यक्षात दोष बियाण्यांच्या गुणवत्तेचा असेल तर त्याची जबाबदारी कंपन्यांनीच स्वीकारली पाहिजे, असे संघटनेने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वेळ न दवडता संबंधित शेतांवर जाऊन पंचनामे करावेत, उगवण न झालेल्या किंवा कमी उगवलेल्या क्षेत्राची नोंद घ्यावी, बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संजीव गिरी, उपाध्यक्ष मोहन नागापूरे, अक्षय जैन, कोषाध्यक्ष गजानन माहुलीकर तसेच सदस्य मदन तायडे (आळेगाव), बाळकृष्ण देवकते (मळसूर), उमेश किर्तने (सस्ती), रवी निमकाळे (बाभुळगाव) आणि संदीप ताले (चान्नी) यांची नावे नमूद आहेत.
पेरणीनंतर उगवणीचा प्रश्न निर्माण झाल्याने आधीच खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता पातूर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

