Drain cleaning : येथील गावात गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची नियमित सफाई न झाल्याने सांडपाणी व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नाली सफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

साखरखेर्ड्यात नाल्यांची मोठी स्वच्छता मोहीम; सांडपाणी व्यवस्थापन सुरळीत करण्याचे काम सुरू
साखरखेर्डा : येथील गावात गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची नियमित सफाई न झाल्याने सांडपाणी व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नाली सफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून गावात सहा प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून रस्ते, नाली, सांडपाणी व्यवस्थापन आणि दिवाबत्ती या मूलभूत सुविधा नागरिकांसाठी अत्यावश्यक आहेत. गावातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून काही ठिकाणी नाल्यांची कामेही करण्यात आली आहेत. मात्र, नाल्यांची नियमित सफाई न झाल्याने अनेक नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या होत्या. परिणामी सांडपाणी नाल्यांमधून बाहेर येऊन रस्त्यावर वाहत होते.
पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत होती. पाऊस पडताच नाल्यांतील कचरा रस्त्यावर येत असल्याने अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरत होते. काही ठिकाणी दुर्गंधी, डासांची वाढ आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने मेहकर येथून मजूर बोलावून नाली सफाई मोहिमेला गती दिली आहे.
वार्ड क्रमांक दोनमधील महाराणा प्रताप नगर परिसरात तर अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली होती. तेथील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. या भागातील समस्या लक्षात घेऊन उपसरपंचांच्या पती संग्रामसिंह राजपूत यांनी स्वतः नालीत उतरून गाळ काढण्याचे काम केले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेत या भागातील नाली सफाईचे काम पूर्ण केले.
याशिवाय माळीपुरा परिसरातील अनेक नाल्या ब्लॉक झाल्या होत्या. वार्ड क्रमांक तीन आणि चारमधील चेंबर उघडून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. तसेच वार्ड क्रमांक पाच आणि सहा मधील अनेक नाल्यांचीही याच पद्धतीने सफाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी अद्यापही नाल्यांतील कचरा आणि साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला अधिक गती दिली आहे.
गावातील आरोग्यदायी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. नाल्यांमधून काढण्यात आलेला अनेक वर्षांचा साचलेला गाळ गावाबाहेर नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत प्रशासकीय सरपंच सौ. ज्योती अमित जाधव म्हणाल्या, “गावातील आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन आणि नाल्यांची सफाई करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून तो गावाबाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”
ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांनीही स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले. “स्वच्छता ही ग्रामपंचायतीची प्रथम जबाबदारी आहे. गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नाली सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.

