Mahabreaking

[breaking_news]

A lesson in safety :शाळेच्या पहिल्या दिवशी सुरक्षिततेचा धडा; अकोला आरटीओचा ‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ उपक्रम

A lesson in safety : शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या स्वप्नांची, नव्या आशांची आणि ज्ञानयात्रेची सुरुवात. मात्र, या ज्ञानप्रवासाइतकाच महत्त्वाचा सुरक्षित प्रवासही असतो, याची जाणीव करून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक ही जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार स्कूल, अकोला येथे हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्कूल बस चालक आणि वाहक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

  A lesson in safety

  विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अकोला आरटीओची जनजागृती; पोदार स्कूलमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम

आगाखान पठाण 

अकोला : शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या स्वप्नांची, नव्या आशांची आणि ज्ञानयात्रेची सुरुवात. मात्र, या ज्ञानप्रवासाइतकाच महत्त्वाचा सुरक्षित प्रवासही असतो, याची जाणीव करून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक ही जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार स्कूल, अकोला येथे हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्कूल बस चालक आणि वाहक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, सिग्नलचे महत्त्व, रस्ता ओलांडताना आवश्यक दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे व्हिजन व्हॅनच्या माध्यमातून उदाहरणांसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमांचे केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष आकलनही झाले.

यावेळी उपस्थित मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप, किरण लोणे, अक्षय ईश्वरे, तसेच चालक आंधळे आणि महाले यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः स्कूल बसमधून सुरक्षित प्रवास कसा करावा, यावर भर देण्यात आला. बस पूर्णपणे थांबल्यानंतरच चढणे-उतरणे, रांगेत शिस्तीने उभे राहणे, बसच्या पुढे किंवा मागे धावू नये, खिडकीबाहेर हात किंवा डोके काढू नये, तसेच चालक आणि शिक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, अशा महत्त्वपूर्ण जीवनरक्षक सूचना विद्यार्थ्यांना सोप्या आणि प्रभावी भाषेत समजावून सांगण्यात आल्या.

कार्यक्रमात पालकांनाही मुलांसाठी आदर्श ठरण्याचे आवाहन करण्यात आले. वाहतूक नियमांचे स्वतः पालन करणे, हेल्मेट-सीटबेल्टसारख्या सुरक्षाविषयक सवयी अंगीकारणे आणि लहानपणापासूनच मुलांमध्ये रस्ता सुरक्षेचे संस्कार रुजविणे किती आवश्यक आहे, यावर भर देण्यात आला. रस्ता सुरक्षा हा केवळ नियमांचा विषय नसून प्रत्येक कुटुंबाच्या जबाबदारीचा आणि प्रत्येक नागरिकाच्या संस्कारांचा विषय आहे, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देतानाच त्यांच्या मनात ‘सुरक्षित प्रवास हीच खरी जबाबदारी’ ही भावना जागविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. शिक्षणाबरोबरच जीवनमूल्ये आणि सुरक्षिततेचे संस्कार देणारा हा उपक्रम समाजात रस्ता सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी वाहतूक नियमांची पुस्तके वाटप करण्यात आली. “ज्ञानाचा प्रवास तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास सुरक्षित असतो” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणारा आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी सुरक्षिततेचा पहिला धडा देणारा हा उपक्रम अकोल्यात विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top