Tragic death of little Aarish: शहरातील इंदिरानगर परिसरातील अवघ्या ११ महिन्यांच्या आरिश शेख या चिमुकल्याचा जेली चॉकलेट गळ्यात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरिशच्या मृत्यूने हळहळ; कब्रस्तानाच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाचा प्रशासनाला जाब
तेल्हारा : शहरातील इंदिरानगर परिसरातील अवघ्या ११ महिन्यांच्या आरिश शेख या चिमुकल्याचा जेली चॉकलेट गळ्यात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरिश खाण्यासाठी जेली चॉकलेट घेत असताना ते त्याच्या घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही बाब आईच्या लक्षात येताच तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरिशच्या निधनानंतरही त्याच्या कुटुंबीयांना दफनविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पावसाळ्यात कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता चिखलमय व अत्यंत खराब होत असल्याने अंत्यविधीसाठी जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही नातेवाईकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची भावना मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे.
मुस्लिम समाजाकडून कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता करण्यासाठी अनेक वर्षांपासून निवेदने, आंदोलने, उपोषणे करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची भेट घेऊनही हा प्रश्न मांडण्यात आला. मात्र आजपर्यंत या मागणीची पूर्तता झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुस्लिम बांधवांचे म्हणणे आहे की, जर विद्यमान ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देणे शक्य नसेल, तर नगर परिषद प्रशासनाने पर्यायी जागेची व्यवस्था करावी.
कब्रस्तान परिसरात नगर परिषदेकडून पाणी व वीज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पाण्याची टाकी अस्वच्छ असल्याची तक्रार आहे. तसेच वीज मीटर बॉक्स जळालेल्या अवस्थेत असून रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थाही नसल्याने अंत्यविधी करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आरिशच्या दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा एकदा कब्रस्तानाच्या रस्त्यासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी मुस्लिम समाजातून होत आहे.

