₹533 crore boost :जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी यंत्रणांनी iPAS प्रणालीचा शंभर टक्के वापर करावा तसेच मंजूर कामांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

विकासकामांत दर्जाशी तडजोड चालणार नाही; iPAS चा १०० टक्के वापर करा” – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील
बुलढाणा : जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी यंत्रणांनी iPAS प्रणालीचा शंभर टक्के वापर करावा तसेच मंजूर कामांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते दृकश्राव्य माध्यमातून बोलत होते. बैठकीला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार किरण सरनाईक, चैनसुख संचेती, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चा आढावा घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यास ५३३ कोटी रुपयांचा मंजूर नियतव्यय असून त्यापैकी ६० टक्के निधी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. सामाजिक, कृषी, ग्रामीण विकास, ऊर्जा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पालकमंत्री जाधव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेत जलजीवन मिशन, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेतील कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नाला खोलीकरणाच्या कामांना गती देण्यावर विशेष भर देत आवश्यक निधी लवकर उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर भर देताना ज्या गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये चालू आर्थिक वर्षात प्राधान्याने स्मशानभूमी विकासाची कामे हाती घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीत आदिवासी घटक कार्यक्रम आणि अनुसूचित जाती उपयोजनेचाही आढावा घेण्यात आला. या योजनांमधील निधी कृषी, सामाजिक सेवा, उद्योग, पाटबंधारे आणि नाविन्यपूर्ण विकासकामांसाठी प्रभावीपणे वापरण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी बुलढाणा, मेहकर आणि खामगाव तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील विकासकामांच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि नियोजनबद्ध कामकाजाला सर्वोच्च प्राधान्य देत नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कटिबद्ध राहावे, असे आवाहन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.

