Green chillies : मासरूळ परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर अनेक शेतकरी उन्हाळी हंगामात मिरचीची लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात. यंदा पीक चांगले येईल आणि बाजारात समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र उत्पादन खर्चात वाढ, रोगराईचा प्रादुर्भाव आणि घसरलेले बाजारभाव यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.

रोगराई, कमी उत्पादन अन् पडते दर; मिरची उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
पंडित सावळे
मासरूळ : मासरूळ परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर अनेक शेतकरी उन्हाळी हंगामात मिरचीची लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात. यंदा पीक चांगले येईल आणि बाजारात समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र उत्पादन खर्चात वाढ, रोगराईचा प्रादुर्भाव आणि घसरलेले बाजारभाव यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मिरची पिकासाठी शेतकरी दोन ते तीन महिने अहोरात्र मेहनत घेतात. नियमित पाणी, खते, औषध फवारणी आणि पिकाची सतत देखरेख करावी लागते. मात्र एवढी मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
यंदा मिरचीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांना केवळ ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने मिरची विकावी लागत आहे. त्यामुळे मिरची तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना मजुरीची रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच वातावरणातील सततच्या बदलांचा परिणाम मिरची पिकावर झाला. रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना वारंवार महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या. एका फवारणीचा परिणाम न झाल्यास दुसरी व तिसरी फवारणी करावी लागल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत.
मिरचीचे पीक हे कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपावे लागते. झाडांची दररोज पाहणी, आठवड्यातून दोन वेळा पाणी, रासायनिक खते आणि कीडनियंत्रणासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. मात्र त्यानुसार बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
मागील दोन ते तीन वर्षांपासून मिरचीच्या उत्पादनात आणि दरात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकरी आता उन्हाळी मिरची आणि भाजीपाला पिकांचे क्षेत्र कमी करून पुन्हा धान शेतीकडे वळण्याचा विचार करीत आहेत.
“वातावरणातील बदलामुळे मिरची पिकावर रोगराईचे मोठे संकट आले. लाखो रुपयांची औषधे फवारूनही अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यातच बाजारभाव अत्यंत कमी असल्याने खर्चही निघत नाही. कर्जाचा बोजा वाढत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.”
— गजानन रामदास सावळे, शेतकरी, मासरूळ

