Suspected Heatstroke : शहरातील सोनाटी रोड परिसरात एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार उष्माघात आणि दारूचे अतिसेवन हे मृत्यूमागील कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतकाची ओळख ज्ञानेश्वर सीताराम खोसरे (वय ३२, मूळ रा. अजीसपूर, ता. लोणार, ह.मु. रामनगर, चिखली) अशी पटली आहे.मेहकर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे.

नवतपाच्या उष्णतेत काळजी घेण्याची गरज : मृतक लोणार तालुक्यातील
मेहकर : शहरातील सोनाटी रोड परिसरात एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार उष्माघात आणि दारूचे अतिसेवन हे मृत्यूमागील कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतकाची ओळख ज्ञानेश्वर सीताराम खोसरे (वय ३२, मूळ रा. अजीसपूर, ता. लोणार, ह.मु. रामनगर, चिखली) अशी पटली आहे.मेहकर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २८ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मेहकर-सोनाटी मार्गावरील कुंजविहार लेआउटजवळील मोकळ्या जागेत, देशी दारू दुकान परिसरात एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप बिरांजे, कांचन जारवाल, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कटक व प्रभाकर शिवणकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले होते.
दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी मेहकर पोलिसांशी संपर्क साधून मृतदेह ज्ञानेश्वर खोसरे यांचा असल्याचे स्पष्ट केले. फिर्यादी शंकर सुरेश खोसरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक २५/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकाच्या शरीरात अल्कोहोल आढळून आले असून उष्माघाताचाही परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
नवतपामुळे उकाड्यात वाढ
दि. २५ मेपासून नवतपाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

