Murtizapur Municipal Council : शहराच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर सध्या निष्क्रियतेचे सावट गडद झाले असून, मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याची चर्चा शहरात रंगत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संजय उमक
मूर्तिजापूर : शहराच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर सध्या निष्क्रियतेचे सावट गडद झाले असून, मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याची चर्चा शहरात रंगत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील मूलभूत सुविधांवर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नाले यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. निर्णयप्रक्रिया ठप्प झाल्याने विकासकामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या परिस्थितीमुळे स्थानिक राजकारणही ढवळून निघाले आहे. नगराध्यक्षांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, त्यांनी स्वतंत्र निर्णयक्षमता दाखवण्याऐवजी राजकीय दबावाखाली काम केल्याचे आरोप पुढे येत आहेत. काही नागरिकांकडून नगर परिषद ही स्वायत्त संस्था राहिली आहे की बाह्य प्रभावाखाली चालणारे कार्यालय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांचे मौन. शहरातील गंभीर प्रश्नांवर कोणत्याही गटाने ठोस भूमिका न घेतल्याने लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधी पक्षाकडून अपेक्षित असलेली आक्रमक भूमिका दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे फाईल्स प्रलंबित राहणे, तक्रारींकडे दुर्लक्ष होणे आणि योजनांची अंमलबजावणी रखडणे असे प्रकार वाढल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी शहर विकासाची गती मंदावली असून, प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे.
सामाजिक माध्यमांवरही या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “नगर परिषद प्रशासन निष्क्रिय” असल्याची भावना बळावत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, तसेच लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
एकूणच, मूर्तिजापूर नगर परिषदेतील सध्याची स्थिती ही स्थानिक प्रशासनातील समन्वय अभाव आणि राजकीय अनास्थेचे प्रतीक ठरत असून, येत्या काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

