Case Registered :गावातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात तब्बल सहा दिवसांनंतर किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. २२ मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर काही काळ पोलिसांत कोणतीही नोंद नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

दुसरबीड : गावातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात तब्बल सहा दिवसांनंतर किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. २२ मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर काही काळ पोलिसांत कोणतीही नोंद नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबल गणेश वारकरी यांच्या फिर्यादीवरून आठ जणांसह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान ईद सणानंतर दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते.
या घटनेत दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तसेच प्रिंट मीडियामध्येही या घटनेची चर्चा झाली होती. त्यामुळे गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, ईदगाह परिसरातील कार्यक्रम आणि शीरखुर्मा वाटपाच्या निमित्ताने झालेल्या किरकोळ वादातून हा संघर्ष चिघळला. विशेष म्हणजे, दोन्ही गट एकाच समाजातील असल्याने या घटनेमुळे सामाजिक सलोख्यावर परिणाम झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पहिल्या गटातील शेख इरफान, जुनेद अली, शेख साजिद, शेख जाकीर तर दुसऱ्या गटातील नौशाद शेख, शेख याकुब, शेख जिरानी आणि शेख इरफान यांच्यासह इतर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बीट जमादार विष्णू मुंडे करीत असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. उशिरा का होईना, पोलिसांनी कारवाई केल्याने गावात तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

