Robber Absconding :दोन वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोराला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत हा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

मिरची पावडर टाकून 4.5 लाखांची लूट; मुख्य आरोपी अखेर जेरबंद
गजानन तिडके
देऊळगाव राजा : दोन वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोराला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत हा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. 236/2023 अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम 395 (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय उर्फ भजा मुरलीधर आदमाने (वय 28, रा. मुकुंदवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) हा 2023 पासून फरार होता. घटनेच्या दिवशी आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकून सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात आरोपीचा माग काढण्यात यश आले आणि छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार एएसआय ओमप्रकाश सावळे, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक वायाळ आणि मनोज खरडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या अटकेमुळे परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास वेगाने पुढे जाण्याची शक्यता असून, फरार आरोपींविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

