Prashish Sonone :गरिबी, अपुरी साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थिती यांना हरवून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रशिष दिलीप सोनोने. सायकलवर गावोगावी फिरून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आज तालुका कृषी अधिकारी बनला आहे—ही केवळ यशकथा नाही, तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.

सायकलवर भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी; जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
बबन इंगळे
बार्शीटाकळी : गरिबी, अपुरी साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थिती यांना हरवून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रशिष दिलीप सोनोने. सायकलवर गावोगावी फिरून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आज तालुका कृषी अधिकारी बनला आहे—ही केवळ यशकथा नाही, तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
अकोला पोलीस भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर; १६१ पदांसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात
बार्शीटाकळी तालुक्यातील सकनी या छोट्याशा गावातील प्रशिषचा प्रवास खडतर संघर्षाने भरलेला आहे. अवघ्या दीड एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे त्यांचे वडील गावोगावी भाजीपाला विकत होते. आर्थिक परिस्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाची आस आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे प्रशिषने कधीच हार मानली नाही.
प्राथमिक शिक्षण आश्रम शाळेतून घेतल्यानंतर त्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर विद्यालयात पूर्ण केले. बारावीमध्ये प्रथम श्रेणी मिळवल्यानंतर त्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवीही प्रथम श्रेणीत पूर्ण केली. यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला.
अमरावती आणि नागपूर येथे कठोर परिश्रम घेतल्यानंतर त्याने दिल्लीपर्यंतचा प्रवास गाठला. ‘बार्टी’च्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा उपयोग करून त्याने रात्रंदिवस अभ्यास करत आपले ध्येय साध्य केले. अखेर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत तो तालुका कृषी अधिकारी पदासाठी पात्र ठरला.प्रशिषच्या यशात त्यांचे आजोबा महादेव सोनोने, आई-वडिलांचे योगदान मोलाचे आहे. नातवाच्या यशाचा अभिमान वाटल्याने आजोबा गावोगावी फिरून ही आनंदवार्ता सांगत आहेत. त्यांच्या या आनंदात संपूर्ण गाव सहभागी झाले आहे.
आज एकेकाळी शेतात मेहनत करणाऱ्या कुटुंबातील मुलगा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करणार आहे, हीच खरी प्रेरणा आहे. प्रशिषची ही यशोगाथा सांगते—“परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत असेल, तर यश नक्कीच मिळते.”

