Professors on an Hourly Basis :राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तासिका तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करत शिक्षण क्रांती अभियानाचे राज्य समन्वयक प्रा. नितीन घोपे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिक्षण क्रांती अभियान आक्रमक : उच्च शिक्षण संचालकांना दिले निवेदन
जळगाव खांदेश : राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तासिका तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करत शिक्षण क्रांती अभियानाचे राज्य समन्वयक प्रा. नितीन घोपे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शासनाने स्पष्ट आदेश देऊनही संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे आणि सहसंचालक कार्यालयांकडून वेळेत अंमलबजावणी न केल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. “शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १५ जूनपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शासन निर्णय असूनही वर्षानुवर्षे भरती प्रक्रिया रखडत असल्याने विद्यार्थ्यांना सत्राच्या सुरुवातीलाच शिक्षक मिळत नाहीत. परिणामी अभ्यासक्रम अपूर्ण राहतो, शैक्षणिक दर्जा खालावतो आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसानही वाढते, असा गंभीर मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, शासन निर्णयांची अंमलबजावणी न करणाऱ्या प्राचार्य, प्रशासन अधिकारी तसेच संबंधित सहसंचालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, दफ्तर दिरंगाई कायदा आणि नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, “नियमांचे पालन झाले नाही तर संबंधित सहसंचालकांवरही थेट गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा कठोर इशारा देत शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणावर लगाम घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या आक्रमक भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, आता शासन व प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहे तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीचे वेळापत्रक
कार्यभार तपासणी : 15 फेब्रुवारी
ना हरकत प्रमाणपत्र मागणी : 1 मार्च
नाहरकत प्रमाणपत्र निर्गमीत करणे : 15 मार्च
जाहीरात प्रसिध्द करणे : 1 एप्रिल
अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवाराची निवड : 15 एप्रिल
नेमणुक आदेश निर्गमीत करणे : 30 एप्रिल
विद्यापीठ मान्यता : 31 मे
तासिका तत्वावरील अध्यापकाची सेवा उपलब्ध करणे : शैक्षणिक वर्षारंभ 15 जून
शासनाच्या आदेशाला केराची टोपली
तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाने 17 ऑक्टोबर 2022 रोजी शासन आदेश काढून कार्यपध्दती निश्चित केली आहे. मात्र,दरवर्षी महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संचानलयाकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखण्यात येते. उशीरा प्रक्रीया सुरू केल्याने तासिका तत्वावरील प्राध्यापकांना कमी महिन्यांचे मानधन मिळते. आधीच 9 महिन्यांचे आदेश असले तरी सहा महिन्यांचे मानधनच तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मिळते. त्यातचही उशीरा ही प्रक्रीया राबवण्यात आल्याने त्यांचा कालावधी कमी होतो. त्यामुळे, शिक्षण क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात कोणत्याही महाविद्यालयांनी तासिका तत्वावरील प्राध्यापक नियुक्तीची प्रक्रीया सुरू करण्यात आलेली नाही.

