CEO Gulab Kharat :क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे निरोगी होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असून, सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.

“वेळेवर निदान-उपचारच क्षयरोगावर उपाय” – जिल्हा परिषदेतून जनजागृतीचा संदेश
बुलढाणा : क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे निरोगी होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असून, सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.
कृत्रिम जलसंकटाचे सावट; थकीत वीजबिलांमुळे पाणीपुरवठा धोक्यात
जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गट्टे, तसेच डॉ. दिनकर खेरोडकर यांची उपस्थिती होती.
क्षयरोगाची सुरुवातीची लक्षणे साधी वाटत असली तरी दुर्लक्ष केल्यास ती गंभीर रूप धारण करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असेही खरात यांनी स्पष्ट केले. जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांचा संयुक्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
सन 2025 मध्ये जिल्ह्यात 2,498 क्षयरुग्ण आढळले होते, तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान 497 रुग्णांची नोंद झाली आहे. डिजिटल हॅन्डहेल्ड एक्स-रे, CBNAAT व TrueNAAT यंत्रणेमुळे ग्रामीण भागातही अचूक निदान शक्य झाले आहे.
दरम्यान, ‘टीबी मुक्त पंचायत’ अभियानात 326 ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून 22 ग्रामपंचायतींना ‘सुवर्ण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत 7,166 फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी विविध आरोग्य पथकांचा तसेच मेहत्रे व लद्धड रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला.

