Stormy Rains :परिसरात दि. १९ व २० मार्च रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, भाजीपाला तसेच फळबागांचे शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

काढणीच्या तोंडावर अवकाळीचा फटका; शेतकरी पुन्हा संकटात
डोणगाव : परिसरात दि. १९ व २० मार्च रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, भाजीपाला तसेच फळबागांचे शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
गारपिटीने शेती उद्ध्वस्त; बुलढाणा जिल्ह्यात २०१ गावांवर संकट, मलकापूर सर्वाधिक बाधित
डोणगावसह आरेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. विशेषतः आरेगाव भागात गहू पिके अक्षरशः आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
या अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे अद्याप नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात पोहोचले नसल्याची नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर किसान काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष विनायक टाले यांनी तहसीलदार, मेहकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. शासनाने त्वरित मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही परिसरातून जोर धरत आहे.

