Battered by Hailstorm :कारेगावसह लोणार तालुक्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. हरभरा, गहू, मका आणि चिया यांसारख्या प्रमुख रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके आडवी पडून सडण्याच्या स्थितीत आहेत.

भागवत चव्हाण
कारेगाव : कारेगावसह लोणार तालुक्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. हरभरा, गहू, मका आणि चिया यांसारख्या प्रमुख रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके आडवी पडून सडण्याच्या स्थितीत आहेत.
या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. आधीच वाढती उत्पादनखर्च, अनियमित बाजारभाव आणि कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता निसर्गानेच घाव घातल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
दरम्यान, कारेगाव परिसरात भेंडी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीसाठी तयार असलेले पीक गारपिटीच्या तडाख्यात सापडले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली, तर भेंडीची झाडे जमिनीवर आडवी पडून उत्पादन पूर्णतः ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी होत आहे. मदतीशिवाय शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला असून, शासनाने केवळ आश्वासन न देता त्वरित निर्णय घ्यावा, असा संतप्त सूर शेतकरी व्यक्त करत आहेत.

