Election fever : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असतानाच, आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे राजकीय नेत्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

स्थानिक राजकारणाला वेग; ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू
बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असतानाच, आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे राजकीय नेत्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.
१७ मार्च २०२६ च्या मध्यरात्रीपासून संबंधित गावांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निकाल जाहीर होईपर्यंत ती प्रभावी राहणार आहे. या कालावधीत मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा किंवा कार्यक्रम राबविण्यावर निर्बंध असणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ ते १३ एप्रिल दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. १५ एप्रिल रोजी छाननी होईल, तर १७ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
या निवडणुकांसाठी मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

