Mahavitarans shock :मिशन ९० दिवस’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शून्य थकबाकी मोहिमेला महावितरणने अधिक गती दिली असून अकोला परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांनी २८ कोटी ८७ लाखांची देयके थकवल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

बिल नाही तर वीज नाही ; वसुलीसाठी महावितरण आक्रमक,अधिकारी उतरले रस्त्यावर
बुलढाणा : ‘मिशन ९० दिवस’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शून्य थकबाकी मोहिमेला महावितरणने अधिक गती दिली असून अकोला परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांनी २८ कोटी ८७ लाखांची देयके थकवल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
अकोला परिमंडळात आतापर्यंत जवळपास २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
अकोला परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा विविध वर्गांतील ३ लाख ५३ हजार ९२ ग्राहकांकडे १२४ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ५६३ ग्राहकांकडे ४५ कोटी २६ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८२३ ग्राहकांकडे ५७ कोटी १७ लाख तर वाशिम जिल्ह्यातील ७९ हजार ७०६ ग्राहकांकडे २२ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
शून्य थकबाकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून ‘मिशन ९० दिवस’ मोहीम सुरू केली आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व तांत्रिक कर्मचारी प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत.
२८ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
वीजबिल वसुलीसाठी करण्यात आलेल्या कारवाईत ४४ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी २८ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६ हजार ९१५ ग्राहकांकडे ९ कोटी ६४ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांकडे २८ कोटी ८७ लाख, तर वाशिम जिल्ह्यातील ६ हजार २१४ ग्राहकांकडे ६ कोटी २० लाख रुपये थकीत असल्याचे सांगण्यात आले.
सामूहिक कारवाईला गती
ज्या गावांमध्ये वीजबिल वसुलीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्या ठिकाणी सामूहिक मोहिम राबवून थेट मीटर काढून आणण्याची कारवाई केली जात आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही या कारवाईत सहभागी होत आहेत. मीटर काढून आणल्यानंतर संबंधित ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम
सध्याच्या आर्थिक वर्षाचे केवळ २१ दिवस शिल्लक असल्याने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल वसुली मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची बिल भरणा केंद्रे तसेच ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा
ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये यासाठी महावितरणने ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय, नेट बँकिंग, वॉलेट्स, तसेच फोनपे, गुगल पे यांसारख्या मोबाईल अॅप्सद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळावरून घरबसल्या बिल भरता येते. बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट भरणा करता येतो. तसेच बिल मुदतीत व ऑनलाईन भरल्यास सुमारे १.२५ टक्के सवलतही दिली जात आहे.
वेळेत बिल भरा, पुनर्जोडणी शुल्क टाळा
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेबरोबरच पुनर्जोडणी शुल्कही भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये, तर थ्री फेज जोडणीसाठी ५२० रुपये शुल्क आकारले जाते. हा अतिरिक्त भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेतल्यास कारवाई
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेत असल्याचे प्रकार आढळतात. मात्र हा प्रकार बेकायदेशीर असून असे आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

