Beloved Sister’ scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत केवायसी प्रक्रियेत झालेल्या किरकोळ त्रुटींमुळे मेहकर तालुक्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) व ऑल इंडिया पँथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जानेवारी रोजी मेहकर येथील महिला व बालविकास कार्यालयासमोर शेकडो महिला लाभार्थ्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व ऑल इंडिया पँथरचा महिला-बालविकास कार्यालयासमोर मोर्चा; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
डोणगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत केवायसी प्रक्रियेत झालेल्या किरकोळ त्रुटींमुळे मेहकर तालुक्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) व ऑल इंडिया पँथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जानेवारी रोजी मेहकर येथील महिला व बालविकास कार्यालयासमोर शेकडो महिला लाभार्थ्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.
डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांचे घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे तात्काळ प्रलंबित रक्कम खात्यात जमा करावी, केवायसीची सक्ती कायमस्वरूपी बंद करावी, तसेच पुन्हा केवायसी करण्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाचे प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले. डोणगाव, नागापूर, लोणी गवळी, अंजनी बु., मेहकर, खंडाळा, पिंपरी माळी, सुलतानपूर, मालखेड, लव्हाळा, शहापूर, अंधृड, वरुड, मोळा, मोळी, शेंडला आदी गावांतील शेकडो लाडकी बहीण लाभार्थी महिला यावेळी उपस्थित होत्या.
धरणे आंदोलनादरम्यान महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर समस्या सोडविण्यात येतील, तसेच महिलांच्या मागण्या शासन स्तरावर कळविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन स्थगित केले.
यावेळी बोलताना प्रशांत पाटील म्हणाले, “मेहकर तालुक्यातील एकही लाडकी बहीण लाभार्थी अन्यायापासून वंचित राहणार नाही. सर्व महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.” लेखी आश्वासन मिळाले असले तरी प्रत्यक्षात लाभ कधी मिळतो, याकडे आता तालुक्यातील हजारो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

